छान छान गोष्टी - भाग १०
गरज सरो, वैद्य मरो
एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला.
तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना.
शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली.
तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा.
तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन."
वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि
त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला.
वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना!
अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का?
माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि
त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल.
पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते."
त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही.
तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की सोयीस्करपणे बदलतात.
No comments:
Post a Comment