कष्टाचे फळ
शेतकऱ्याच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार ? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व तो एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलावतो व त्यांना सांगतो की, "आपल्या पूर्वजांनी शेतामध्ये एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या."
दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे, म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले.
त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यांना भरपूर धन मिळाले.
गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला. तेव्हा ते बोलले,'मी तुम्हाला याचा धनाबद्दल सांगत होतो. जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.'
तात्पर्य- कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.
No comments:
Post a Comment